आदिवासी लाभार्थ्यांना मिळणार सोयी सुविधांचा लाभ

प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर
चंद्रपूर : चंद्रपूर व चिमूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील लाभार्थ्यांना धरती आबा जनजातीय उन्नत ग्राम योजनेतील सोयीसुविधांचा लाभ मिळणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.यांनी जिल्हाधिकारी कार्याल्यात नुकतीच बैठक घेतली. यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूरचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार उपस्थित होते.पंतप्रधान यांनी २ ऑक्टोबर २०२४ रोजी हजारीबाग येथे धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाची सुरूवात केली.सदर अभियानामध्ये राज्यातील आदिवासी जमातीच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी १७ शासकिय मंत्रालय विभाग यांचे मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या अनुषंगाने २५ उपक्रमाचा समावेश आहे. सदर अभियानामध्ये चंद्रपुर जिल्हयातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,चंद्रपुर अंतर्गत एकूण १० तालुक्यांतील ११५ आणि चिमुर प्रकल्पातंर्गत ०५ तालुक्यांतील ५५ अशा एकूण १६७ गावांचा समावेश असणार आहे. सदर योजनेच्या अनुषंगाने सद्यास्थितीचा कामाचा आढावा घेण्याकरीता जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यामध्ये विविध शासकीय यंत्रणेकडून योजनेसंदर्भात माहितीचा आढावा घेण्यात आला. योजनेच्या परिणामकारक अंमलबजावणीकरिता जिल्हा स्तरावर व तालुका स्तरावर जिल्हास्तरीय समन्वय समिती व तालुकास्तरीय समन्वय समिती स्थापन करण्यात आलेली आहे.यावेळी जिल्हाधिकारी गौडा म्हणाले,ही योजना आदिवासी समाजाकरीता अतिशय उपयुक्त ठरणार आहे.योजनेच्या माध्यमातून आदिवासी समाजाकरीता सोयीसूविधा व शिक्षणाची दर्जेदार संधी उपलब्ध होणार आहे.त्या माध्यमातून प्रगतीशील जीवन जगण्याची एक उत्तम संधी या समाजास प्राप्त होणार आहे. त्यासाठी १७शासकिय विभागांनी जिल्हयातील १६७ गावांचा विकास कार्यक्रमाचा आराखडा तयार करण्याबाबात कार्यवाही करावी अशा सुचना त्यांनी यंत्रणेला दिल्या.